पुणे : ‘पुण्यातील ससून हॉस्पिटल, निवारा संस्था, मुंबईतील काळा घोडा, मशीद बंदर, कोकणातील अनेक प्रार्थनास्थळे पाहिल्यानंतर ज्यू समाजाच्या वास्तुरचनेचा वारसा आपल्या लक्षात येतो. एवढेच नव्हे, तर या आणि अशा सामाजिक कार्यात ज्यू लोकांनी दिलेले योगदान आणि मराठी भाषा-संस्कृतीशी असलेली नाळ पाहता त्यांचा समाजकल्याणाचा वारसा प्रभावाने दिसतो,’ असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्टिफिक ॲंड एज्युकेशनल रिसर्च (आयसर) येथील शास्त्रज्ञ डॉ. पुष्कर सोहोनी यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि ‘आयसर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एस. एम. जोशी सभागृहात रंगलेल्या ‘सायन्स गप्पा’ कार्यक्रमात डॉ. सोहोनी बोलत होते. या प्रसंगी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., सचिव नीता शाह, ‘आयसर’च्या अपर्णा जोशी उपस्थित होते. या वेळी विज्ञान परिषदेचे सभासद विजय हांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. सोहोनी म्हणाले, ‘मुंबई, पुणे, उत्तर कोकण, अहमदाबादसह कराचीमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यू लोकवस्ती आढळून येते. आजघडीला महाराष्ट्रात जवळपास साडेचार हजार ज्यू लोक राहताहेत. ज्यूंच्या पुरातन इमारती, विशेषत: मुंबई, पुणे आणि उत्तर कोकणामधील अनेक गावांमध्ये आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक स्मारके, सिनेगॉग, स्मशाने, इस्पितळे, शाळा, ग्रंथालये, वखारी, ज्यू उद्योगपतींच्या कापड गिरण्या, पुतळे आणि अन्य नागरी सुविधातून वास्तूरचनेचा प्रभाव दिसतो. कोचीन, बेने इस्राईल आणि बगदादी अशा तीन प्रमुख जमातींमध्ये ज्यू लोक विभागले होते. त्यातील बेने इस्रायल ही मंडळी मराठीशी अधिक सुसंगत होती.’
विनय र. र. यांनी अध्यक्षीय भाषण केले. अपर्णा जोशी यांनी प्रास्ताविक केले. नीता शहा यांनी आभार मानले.